मुंबई: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मध्ये प्रदेशात एक सभेदरम्यान अनपेक्षित अनुभव आला. बुधवारी आपल्या भाषणादरम्यान इराणी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘ काँग्रेस सरकारने तुमचे कर्ज माफ केले का?’ असा सवाल विचारला तेव्हा इराणी यांना या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे अपेक्षित असावे. पण झाले उलटेच, उपस्थित शेतकऱ्यांनी यावर ‘हो’ असे उत्तर दिले. या अनपेक्षित उत्तरामुळे इराणी यांना पुढे काय बोलावे हे क्षणभर समजलेच नाही.
दरम्यान, विरोधी पक्षांनी संधी साधत स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोंबडं कितीही झाकलं तरी आरवल्याशिवाय राहत नाही, या वाक्याची चांगलीच प्रचिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मध्यप्रदेशात आली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर केली आहे.
देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी भूमिका खा. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वेळोवेळी मांडली आहे. मात्र केंद्रातील भाजप सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही. देशाचं कृषीमंत्रीपद सांभाळत असताना शेतकऱ्यांना उठून उभे करण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशात कधी नव्हे इतकी ७२ हजार कोटींची कर्जमाफी झाली. त्या कर्जमाफीसाठी ना कोणते निकष होते, ना कोणते नियम होते. कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात गेली होती. २०१९च्या निवडणुकांमध्येही युपीएच्या जाहीरनाम्याचा प्रमुख मुद्दा हा शेतकऱ्य़ांची कर्जमाफी आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांच्या नादी न लागता या निवडणुकांमध्ये शेतकरी वर्ग सत्याची बाजू घेणार हे या व्हिडिओतून स्पष्ट झाले, असेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.