संगमनेर – कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक आ. थोरात यांची निवड करण्यात आली. थोरातांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याचे कळताच संगमनेर शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसेच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
कॉंग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा विधिमंडळातील नेता असा आमदार थोरात यांचा प्रवास थक्क करणारा ठरला आहे. संगमनेर मतदारसंघाची धुरा सांभाळताना कॉंग्रेसच्या देशपातळीवरील समितीमध्ये स्थान पटकावून थोरात यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. 1985 पासून ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुका ते जिंकले आहेत. शेकापचे गणपतराव देशमुख यांच्यानंतर तेच विधानसभेतील वरिष्ठ आमदार आहेत. विरोधकांनी केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना अत्यंत समन्वयाने व संयमाने तोंड देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य. कोणी कितीही टीका केली, तरी आपला तोल ढळू न देण्याची त्यांची ख्याती आहे. थोरातांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्यासह विविध संस्था यशस्वी चालून त्यांनी आदर्श घडवून दिला. 1999 मध्ये थोरातांना राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले.
त्यानंतर त्यांना कृषीमंत्री, महसूलमंत्री म्हणून कारकीर्द कोणत्याही आरोपाविना गाजविली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून थोरातांकडे पाहिले जाते. हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या विधिमंडळ निरीक्षकपदी थोरात यांची निवड झाली होती. गुजरात निवडणुकीच्या दरम्यान विधानसभा सदस्य निवडीच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही थोरात यांनी कसून प्रयत्न केले.
आज नगर जिल्ह्यात विखेंचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. विखेंचा हा प्रभाव विधानसभा निवडणुकीत थोरात किती कमी करणार, याकडे त्यांचा कस लागणार आहे. कॉंग्रेसला खरी लढाई विधानसभा निवडणुकीत लढायची आहे. त्या लढाईत विखे आणि थोरात यांच्यात खरा सामना रंगणार आहे. त्यात थोरात कसे फासे टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. थोरातांची अपेक्षेप्रमाणे विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर संगमनेर शहरात आणि तालुक्यात कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी फटाके व गुलालांची उधळण झाली.
आ. बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान पाईक आहेत. पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या असून त्यांच्या निवडीने संयमी, कणखर व निष्ठावान नेतृत्वाचा सन्मान झाला आहे. सत्तेसाठी पक्ष बदलणारे अनेक आहेत. सध्या सर्वत्र आयाराम, गयारामांची संख्या वाढली आहे. मात्र अडचणीच्या काळातही आ. थोरात यांनी कायम कॉंग्रेस पक्षाची साथ केली आहे. थोरातांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस राज्यात पुन्हा भरारी घेईल असा विश्वासही आहे.
सुधीर तांबे , आमदारआगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीचे आव्हान आहे. विधिमंडळाचे कॉंग्रेसचे नेतेपद मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. या पदाच्या माध्यमातून कॉंग्रेसची ताकद वाढविण्याचे काम पुढील काळात करणार आहे.
आ. बाळासाहेब थोरात, विधीमंडळ नेते, कॉंग्रेस