कराड – अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री, गांधी कुटुंबाचे आणि पक्षाचे निष्ठावंत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा वाहिन्यांवर सुरू आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त पक्षातील अन्य नेत्यांची पक्षाध्यक्षपदी निवड करावयाची झाल्यास त्यात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच लोकसभेच्या निकालानंतर चव्हाण दिल्लीतच असल्याने यास बळकटी मिळत असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कॉंग्रेसजनांचे लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे लागले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरात 2012 साली पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 2014 साली त्यांनी दक्षिण कराड विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकली. मात्र कॉंग्रेस पक्षाला सत्ता सोडावी लागली. गेल्या पाच वर्षात विरोधी बाकावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली अभ्यासू शैलीच्या जोरावर मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका केली. “राफेल’ खरेदीतील तफावत मांडण्यात ते आघाडीवर होते.