रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी
रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करण्याच्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रायगड संवर्धनाच्या कामांची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.
किल्ले रायगड विकासासाठी शासनाने 606 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 59 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यासंदर्भात किल्ले रायगड येथे आज मुख्यमंत्री फडणवीस हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
\रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी निगडीत केले जात आहे. शिवाय किल्ले परिसरात पर्यटकांना येण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, किल्ल्याकडे येणारे रस्ते रुंदीकरण करणे, त्यासाठी जमीन संपादन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप-वे ने किल्ल्यावर दाखल झाले. रोप-वे अप्पर स्टेशन पाथवे येथून कुशावर्त तलाव, वाघ दरवाजाकडे जाणाऱ्या या मार्गाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी जगदीश्वराचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. शिर्काई देवीचे दर्शन घेऊन ते हत्तीखान्यात रायगड विकास प्राधिकरणाच्या आतापर्यंत झालेल्या कामांचे व्हीडिओ चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
रायगडवरील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेसाठी गडावरील 22 तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्तीच्या कामांची माहिती त्यामध्ये देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजसदरेवर सिंहासनावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बालेकिल्ला, राणीवसा पाहून ते मेणा दरवाजामार्गे खाली उतरले.