पुणे – स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेविषयक कामे सुरू आहेत. या कामांना गती मिळण्यासाठी, जिल्ह्यातील स्वच्छतेचा दर्जा वाढण्यासाठी “स्वच्छ गाव-स्वच्छ तालुका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आला, परंतु अद्यापपर्यंत या पुरस्काराचे वितरण झाले नसून, आचारसंहितेमुळे पुरस्कार लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्हा परिषदेच्या या स्वच्छ गाव – स्वच्छ तालुका स्पर्धेत पुरंदर तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. तर वेल्हा तालुका द्वितीय तर खेड व बारामती तालुक्यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. जिल्ह्यातून 39 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या होत्या. या 39 ग्रामपंचायती वरून व एकूण तालुक्याच्या या योजनेतील सहभागावरून तीन तालुक्यांना चांगले काम केल्याबद्दल गुणांकन पद्धतीने निवडण्यात आले आहे. जिल्हास्तरावर विशेष पारितोषिक देऊन या 39 ग्रामपंचायती व 3 तालुक्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी गावोगाव मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने लोकसहभाग मिळाला. परंतु या स्पर्धेचे पुढे काय झाले, असा प्रश्न सध्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना नागरिक विचारत आहेत. त्यांना देखील याचे उत्तरे सांगता येत नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.