श्रीगोंदा -श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोरच आज दुपारी आदिवासी पारधी समाजातील दोन गटात तुफान मारहाण झाली. या भांडणाचे रूपांतर पुढे दगडफेकीत ही झाल्याचे अनके प्रत्यक्षदर्शिनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना सांगितले. पोलीस ठाण्यासमोरच ही घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 21) दुपारी आदिवासी पारधी समाजातील काही व्यक्ती पोलीस ठाणे व सेतू कार्यालयासमोर जमले होते.
पोलीस ठाण्यासमोर किरकोळ
भांडणे : दौलतराव जाधव
या प्रकरणाचे पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी खंडन केले. ते म्हणाले की, आदिवासी पारधी समाजातील दोन गटात पोलीस ठाण्यासमोर किरकोळ स्वरूपाचे भांडणे झाले. पोलिसांनी त्यांना समज देत तेथून जाण्यास सांगितले. मात्र त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात याच दोन्ही गटात मोठी मारहाण झाली. या प्रकरणी दोन्हीकडील फिर्यादीवरून गुन्हा दाखल करीत आहोत.
त्यांच्या दरम्यान किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. त्यांचे रूपांतर पुढे भांडणात झाले. जोरदार सुरू झालेल्या मारहाणीचे रूपांतर पुढे दगड भिरकविण्यापर्यंत गेले. काही वेळ सुरू असलेली ही धुमश्चक्री अनेकांनी पाहिली. ही बाब पोलीस ठाण्यात कळल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबधीताना तेथून जाण्यास सांगितले.
पुढे हे दोन्ही गट येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथे त्यांच्यात पून्हा वाद सुरू झाला. अन् त्या ठिकाणी ही तुंबळ हाणामारी सुरू झाली. या दोन्ही घटना घडून ही श्रीगोंदा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र सायंकाळी उशिरा भांडणे करणारे हे दोन्ही गट परस्परविरोधी फिर्याद दाखल करत होते.
परस्परविरोधी फिर्यादीवरून रात्री श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. श्रीगोंदा येथे पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत हाणामारी झाल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.