हेळगाव – राज्यात वाढत असलेले तापमान आणि त्यात अवकाळी पाऊस अजूनही न झाल्याने राज्यात उष्णतेची प्रचंड लाट निर्माण झाली असून यामुळे सर्वत्र उकाडा जाणवत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात उन्हाची दाहकता कमी प्रमाणात असायची. परंतु यावर्षी हे तापमान जवळपास 40 डिग्रीपर्यंत पोहोचल्याने जनता उकाड्याने प्रचंड त्रस्त असून याचा परिणाम अबालवृद्धांवर होत आहे. अनेकजण आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.
उन्हाळ्यात साधारण 38 डिग्रीपर्यंत तापमान असायचे परंतु गेल्या काही वर्षात यामध्ये वारंवार वाढ होत आहे. विदर्भ मराठवाडा याठिकाणी जेवढे तापमान असायचे तेवढे तापमान आता सातारा जिह्यात झाले आहे. साहजिकच याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. लोक उकाड्याने त्रस्त असल्याने थंडगार पेय तसेच झाडांचा आधार घेत आहेत. थंडगार पेयांचा परिणाम आरोग्यावर होत असून तापाच्या साथीने अनेकजण त्रासले आहेत. शेतकरी वर्गाकडून पेरणीपूर्वीची तयारी केली जात असून आता गरज आहे ती पावसाची. थोडासा पाऊस झाल्यास उष्णता कमी होण्यास मदत होईल. गेल्या दोन दिवसात वातावरण फार उष्ण झाले असून येत्या काही दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.