अन्यथा वेळ वाचण्यासाठी खासगी वाहतुकीचा अवलंब
नगर: राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर अगदी खेडोपाडी, अगदी छोट्या गावापर्यंत एस. टी. बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असते, या सेवेचे खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, परंतु हल्लीच्या काळात अहमदनगर विभाग याला अपवाद म्हणावा लागेल.
याचे कारणच असे आहे, इथले अधिकारी एस.टी. सेवा नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नसून आलेला दिवस काढायचा, प्रवाशांच्या मनात विश्वासार्ह वातावरण करण्याऐवजी त्यांना चीड कशी येईल अशा प्रकारचे काम करताना दिसून येत आहेत.
अहमदनगर-पुणे अथवा पुणे-अहमदनगर ही बससेवा गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी नित्यनेमाने चालू असून अहमदनगर-पुणे या मार्गावरूनच एस. टी. प्रथम धावली आहे हे अभिमानाने म्हणावेसे वाटते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये नगर ते पुणे हे अवघ्या 118 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एस. टी. ला आता अडीच तासाऐवजी साडेतीन ते चार तास लागत आहेत.
आपण ट्रॅफिक मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे उशीर लागत असेल हे समजू शकतो. परंतु यात भर म्हणून की काय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने एस. टी. एखाद्या धाब्यावर अर्धा अर्धा तास थांबायला लागलीय. केवळ 118 किलोमीटरच्या या प्रवासाला जर बस अर्धा तास थांबत असेल तर हा सारा प्रकार प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासारखा आहे. देश दळणवळणाच्या माध्यमातून जवळ येण्यासाठी प्रयत्न होत असताना अहमदनगर एस. टी. विभाग त्यापासून अनभिज्ञ आहे असे म्हणावे लागेल.
बसेस धाब्यावर थांबण्याचे नेमके गौडबंगाल काय हे धाबे, हॉटेल्स अधिकृत आहेत का? नसतील तर यासाठी कोणाचा आशीर्वाद आहे. की हे सारे संगनमताने चालू आहे.जर या हॉटेल्सना परवानगी असेल तर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात, परंतु अवघ्या दोन तासांच्या प्रवासासाठी अर्धा तास बस थांबणे किती संयुक्तिक आहे. अहमदनगर बस स्टॅंड अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असेल अन त्यावेळी गाडी हॉटेलला थांबत असेल तर ही बाब प्रवाशांना चीड आणणारी आहे.
या साऱ्या प्रकाराची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी. अन्यथा एस. टी. च्या हक्काचा प्रवासी खासगी प्रवास वाहतुकीकडे वळायला वेळ लागणार नाही. या साऱ्या संतापजनक प्रकारामुळे एस. टी. चे प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी वाहतुकीला नाईलाजाने पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांनी निदान एस. टी. च्या भवितव्याचा विचार करून कर्तव्य भावनेतून अहमदनगर. अथवा पुणे-अहमदनगर हा प्रवास योग्य वेळेत होण्यासाठी बस अनधिकृत पणे कोठेही न थांबविता अथवा या बाबतीत कोणी उल्लंघन करीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी व या संतापजनक प्रकाराला आळा घालावा अन्यथा नगरकरांच्या, प्रवाशांच्या या मागणीसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल. असे निवेदन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिले आहे.