प्रभागनिहाय होणार आराखडा; नागरिकांनी सहकार्य करावे
नगर – नगर शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. आराखडा तयार करण्यासाठी हे विद्यार्थी नगरला दाखल झाले असून त्यांनी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नगररचना शाखेतील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा आराखडा तयार करून दिला. याची माहिती मिळाल्यानुसार या विद्यार्थ्यांना अहमदनगर महापालिकेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने विकास आराखड्याबाबत माहिती देण्यासाठी बोलविण्यात आले. विद्यार्थ्यांचा समुह प्रशिक्षणासाठी नगर शहरात दाखल झाले आहेत. महाविद्यालयातील नगरचना शाखेतील विद्यार्थ्यांना शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षण दिले जाते. यामध्ये वाहतूक नियोजन, घनकचरा नियोजन, पाणीपुरवठा नियोजन, सिवरेज सिस्टीम, जीआयएस सॉफ्टवेअरवर आधारित शहराचा बेस मॅप, झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरण पुरक योजना इत्यादीचे शिक्षण दिले जाते.
स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा तयार करण्यासाठी 18 ते 20 विद्यार्थ्यांचा समुह, महापौर, नगररचना विभाग व महापालिकेतील अन्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली 40 ते 45 दिवस शहरात कार्यरत राहणार आहे. हे विद्यार्थी प्रभागनिहाय फिरून नागरिकांशी संवाद साधून, प्रत्यक्ष घटनास्थांना भेटी देवून त्यानुसार विकास आराखडा तयार करणार आहेत. त्यात नागरिकांचा देखील विकास कामात सहभाग असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन वाकळे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचा समूहाने प्रभाग क्र. 6 मधून कामास सुरूवात केली आहे.विद्यार्थ्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था वाकळे यांनी केली आहे. नगर शहराचा शाश्वत विकास करण्याची अत्यंत गरज असून स्मार्ट सिटीच्या शर्यतीत नगर शहर उच्च शिखर गाठेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांच्या समुहाचे प्रतिनिधीत्व हे आशुतोष गायकवाड व निनाद देशपांडे करत आहेत. वाकळे म्हणाले, नगर शहरात विकासाचा मोठा अनुशेष आहे. त्यामुळे शहराचा सुनियोजित आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने हे विद्यार्थी विकास आराखडा तयार करणार आहेत. विद्यार्थी शहरामध्ये प्रत्येक प्रभागनिहाय फिरून विकास आराखडा तयार करणार आहेत. आराखडा तयार असल्यास विकास कामे करताना त्याचा महापालिकेस उपयोग होईल. महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून आचारसंहितेमुळे विकासाचे कामे करण्यास अडचणी आलेल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर कामांना गती देण्यात येणार असून कामे पूर्ण करण्यात येतील.