चिखली – कोणतीही पूर्वकल्पना न देता पीएमपीएमएल प्रशासनाने चिखली ते पिंपरीगाव ही बससेवा बंद केल्याने चिखलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही बससेवा पुर्ववत करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महापालिका क्षेत्रीय समितीचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.
यासंदर्भात दिनेश यादव यांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिखली गावातून येणारी बस कुदळवाडी, पवार वस्ती, मोरे पाटील चौक, केएसबी, मोरवाडी चौक, मनपा चौक ते पिंपरी गाव या मार्गावर ही बस धावत होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता ही बस बंद करण्यात आली. त्यामुळे कुदळवाडी भागातील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, दूग्ध व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
खासगी वाहनाने त्यांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. कोणाच्या सांगण्यावरुन हा बसमार्ग बदलला, असा सवाल दिनेश यादव यांनी केला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी बससेवा पुर्ववत न केल्यास प्रवाशांसोबत आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.