कोथरूड -“देशात आणि राज्यात सर्वसमावेशक विकास साधला जात आहे. समाजात मोठा बदल घडत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये लक्ष्मीनगर येथे साकारलेल्या बौद्ध विहार आणि अण्णा भाऊ साठे सभागृहाच्या नूतनीकरणासह प्रभागातील ई-क्लिनिक, व्यायामशाळा, हनुमान मंदिर, नवीन प्रकाश व्यवस्था, भूमिगत विद्युत वाहिन्या, अंगणवाडी, महिला उद्योग केंद्र आदी विकासकामांचे लोकार्पण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, अल्पना वरपे, दिलीप वेडे-पाटील, मंजुश्री खर्डेकर, कार्यक्रमाचे संयोजक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, “आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला अण्णा भाऊंचे मोठे आकर्षण आहे. मात्र, अण्णा भाऊंना मानणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक एकत्र येत नाही याची खंत वाटते. आपल्या विनोदी शैलीत बोलताना “जमलेल्या माणसांचे पाहिल्यावर मोहोळ, अजून पुढे जाणार मुरलीधर मोहोळ’ अशा शब्दांत चारोळी करताच उपस्थितांनी जल्लोष केला.
मोहोळ म्हणाले, “बौद्ध विहार साकारताना आणि अण्णा भाऊ साठे सभागृहाचे नूतनीकरण करताना मनात वेगळे समाधान आहे. विकास करताना सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्याची भूमिका होती. त्यातूनच विविध कामांना प्राधान्य देत कामे पूर्ण केली आहेत.