गडहिंग्लज येथे महावितरणच्या 2.42 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. जगाच्या तुलनेत भारतात तिन्ही ऋतू समान कालावधीचे आहेत. सौर ऊर्जा मुबलक असून ती फुकट आहे. या सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती केल्यास शेतीला व उद्योगाला स्वस्तात वीज मिळेल. हजारो कोटींचे शासन अनुदान वाचून विजेचे अर्थकारणच बदलेल असे प्रतिपादन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गडहिंग्लज येथे महावितरणच्या 2.42 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत महावितरणच्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या ईईएसएल कंपनीसोबत 200 मेगावॅट वीज खरेदीचा करार केला आहे. त्यातून गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज व हलकर्णी तर चंदगड तालुक्यातील शिनोली येथे अनुक्रमे 1 मेगावॅट, 0.7 व 0.5 मेगावॅट क्षमतेचे लघु सौर ऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. याचा लाभ 500 शेतकऱ्यांना होणार आहे. कोल्हापूर परिमंडलातील हा पहिला सौर प्रकल्प आहे. या तिन्ही प्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी 11 वाजता गडहिंग्लज येथील महावितरण विभागीय कार्यालय परिसरात झाले. यावेळी व्यासपीठावर म्हाडाचे अध्यक्ष श्री. समरजितसिंहराजे घाटगे, आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, आ. हसन मुश्रीफ, माजी आ. श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, हलकर्णीच्या सरपंच श्रीमती विलासमती शेरवी, शिनोळीच्या सरपंच सौ. नम्रता पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये, ईईएसएल कंपनीचे संचालक व्यंकटेश द्विवेदी, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक कोकाटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ना. चंद्रकांतदादा म्हणाले, कोळशाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पारंपारिक विजेवरचे अवलंबित्वही कमी करावे लागणार आहे. जलविद्युत निर्मितीलाही मर्यादा आहेत. त्यात अपारंपरिकमध्ये सौरऊर्जा मुबलक व 365 दिवस उपलब्ध आहे. सौर ऊर्जेत एकदाच गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक वाढविल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आगामी दोन वर्षांत सौरऊर्जेवर वळविता येईल. उद्योगांनीही त्यांना लागणारी वीज स्वत: तयार केली तर विजेचे अर्थकारण बदलेल असा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या ‘नाविन्यपूर्ण योजने’तून जुने पोल बदलण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आ. संध्यादेवी कुपेकर यांनी सौर प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मतदार संघातील सडलेले खांब बदलण्यासाठी जिल्हा नियोजन मार्फत निधी देण्याची मागणी केली. तर आ. हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना सौर व पारंपरिक जोडणी ऐच्छिक केल्याबद्दल शासनाचे आभार मानत प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर वीज जोडण्या देण्याची मागणी केली. त्यावर ना. चंद्रकांतदादांनी मार्च 2020 पर्यंत सर्व वीज जोडण्या पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी सौर प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी पंचक्रोशील नागरिक व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.