नवी दिल्ली – चंद्रावर दुसऱ्यांदा पाऊल ठेवण्याची भारताची महत्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-2 सुरु होण्याबाबतची प्रतीक्षा संपली असुन पुढील महिन्यांत 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. भारतीय अंततराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी आज (बुधवार दि.12) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
चांद्रयान-2 हे 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लॅंडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन 27 किलो असून लांबी 1 मीटर आहे. लॅंडरचे वजन 1.4 टन आणि लांबी 3.5 मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन 2.4 टन आणि लांबी 2.5 मीटर इतकी आहे.
15 जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर जीएसएलव्ही एमके 3 मधून कंपोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कंपोझिट बॉडीच्या खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरु झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर काही दिवसांनी ती चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर योग्य वेळी लॅंडर ऑर्बिटरपासून वेगळा होईल, त्यानंतर लॅंडर चंद्रापासून 30 किमी अंतरावरील कक्षेत 4 दिवस फिरत राहिल.
प्रत्यक्ष चंद्रावर लॅंडिगच्या दिवशी लॅंडरची प्रोपल्शन सिस्टिम त्याचा वेग कमी करेल आणि लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवेल. या प्रक्रियेसाठी सुमारे 15 मिनिटांचा वेळ लागेल. या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करतानाच या मोहिमेची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. सिवन यांच्या हस्ते करण्यात आले.