तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्रीय समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी निकाल लागण्याच्या आधीच सुरू केलेल्या राजकीय हालचालीने राजकीय निरीक्षकांचे कुतूहल चाळवले गेले आहे. देशाचे राजकारण सध्या ज्या वेगवेगळ्या दिशेने वळण घेत आहे त्यातलीच ही एक लक्षणीय घडामोड सध्या चर्चेत आहे. चंद्रशेखर राव यांनी बिगर कॉंग्रेस, बिगर भाजप अशा स्वरूपाची तिसरी आघाडी पुन्हा स्थापन करण्याचा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने हाती घेतला आहे. त्यांनी निवडणुकीच्या निकालाच्या आधीच ही जी उठाठेव सुरू केली आहे त्यातून अनेक अन्वयार्थ निघत आहेत.
मुळात प्रश्न हा आहे की त्यांना स्वतःला बिगर कॉंग्रेस, बिगर भाजप पक्षांमध्ये म्हणावी तितकी मान्यता आहे काय? आणि असेलच तर निवडणूक प्रक्रिया संपत आल्यानंतर त्यांनी हे प्रयत्न हाती घेण्याचे कारण काय? त्याहून सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संख्याबळाच्या आधारावर त्यांची नेमकी हैसियत किंवा पात्रता काय? असे प्रश्न या निमित्ताने साहजिकच उपस्थित होतात. पण चंद्रशेखर राव यांनी असल्या प्रश्नांना किंवा शंकाकुशंकांना फार किंमत न देता गेल्या दोन-चार दिवसांत केरळचे मुख्यमंत्री विजयन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेविषयी चर्चा केली. ते तमिळनाडूतही गेले होते, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्याशी त्यांनी चर्चा केली; पण स्टॅलिन यांनी त्यांच्या या साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. आम्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढवली असून आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आहोत, असे स्टॅलिन यांनी चंद्रशेखर राव यांना स्पष्ट केले आहे.
आजच्या घडीला बिगर कॉंग्रेस किंवा बिगर भाजप आघाडीला काहीही भवितव्य नाही, असेही स्टॅलिन यांनी राव यांना स्पष्ट केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. द्रमुक नेते स्टॅलिन यांनी या आधीही चंद्रशेखर राव यांना भेटण्यास वेळ दिला नव्हता. राव यांनी हा पुढाकार घेण्यास स्टॅलिन यांचा पहिल्यापासूनच विरोध असावा. पण मुळात प्रश्न असा आहे की, चंद्रशेखर राव यांना निवडणूक संपत आल्यावर या तिसऱ्या आघाडीच्या संकल्पनेसाठी पुढाकार का घ्यावासा वाटला? निवडणुकीच्या आधी त्यांनी हा प्रयत्न केला असता तर त्याला वेगळे महत्त्व होते. पण त्यांना त्यावेळी फार प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी चिकाटी सोडलेली नाही. केंद्रात भाजप किंवा कॉंग्रेसप्रणीत आघाडी यांपैकी कोणालाही बहुमत मिळणार नाही, असे चित्र काही चाचण्यांमधून पुढे आल्याने आणि अन्य पक्षांना मिळणाऱ्या जागा दीडशेच्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने त्यांना पुन्हा नव्याने प्रयत्न हाती घ्यावेसे वाटले असावे.
अन्य पक्षांना जर दीडशेच्या आसपास जागा मिळणार असतील तर या पक्षांचे नेतृत्व करावे अशीही त्यांची मनीषा असावी. पण मुळात जिथे संपूर्ण तेलंगणा राज्यातील लोकसभा जागांची संख्या केवळ 17 इतकीच आहे आणि जरी सर्वच्या सर्व जागा त्यांना मिळाल्या तरी राव यांच्या पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ केवळ 17 इतकेच असेल. इतक्या कमी संख्याबळाच्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते काय, हा फार दूरचा प्रश्न झाला, पण त्यांना या कथित तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व द्यायला तरी अन्य पक्षांचे नेते तयार होतील का? हा मुख्य प्रश्न आहे.
या बिगर कॉंग्रेस, बिगर भाजप पक्षांमध्ये ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव या मातब्बर नेत्यांचाही समावेश असताना चंद्रशेखर राव यांची उठाठेव मात्र निश्चितच कुतूहल चाळवणारी ठरते आहे. आजच्या घडीला एक बाब मात्र अतिशय स्पष्ट आहे की, अनेक पक्षांना मोदी किंवा भाजप नको आहे, पण त्याच वेळी त्यांच्यातील अनेकांना कॉंग्रेसचे वर्चस्वही नको आहे. अशा मानसिकतेत असलेल्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या आधीच झाला असता तर लोकांपुढील तोही एक सक्षम पर्याय ठरला असता. पण त्यांच्यात कायमच नेतृत्व कुणी करायचे हा कळीचा प्रश्न असतो आणि त्यातून हा तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव बारगळतो. काहींना चंद्रशेखर राव हे भाजपच्या वतीनेही हालचाल करीत असावेत, असे वाटते आहे. ज्या पक्षांशी भाजपचे नेतृत्व थेट आघाडी करण्याविषयी बोलू शकत नाहीत त्यांच्याशी चंद्रशेखर राव यांच्यामार्फत जवळीक साधण्याचा हा प्रयत्न असावा, असे मानण्यास जागा आहे. त्यामुळेच राव यांच्या या उठाठेवीला महत्त्व आले आहे.
भाजपपुढे बहुमतासाठी कमी पडणाऱ्या जागा कोठून भरून काढायच्या? हा मुख्य प्रश्न असणार आहे. एनडीए बाहेरील अन्य राजकीय पक्षांमध्ये मोदी विरोध मोठा आहे. अन्य कोणीही चालेल; पण मोदी नको असे मानणाऱ्या पक्षांची संख्या मोठी असल्याने या पक्षांना राजी कसे करायचे? हा भाजप नेतृत्वापुढील मोठा प्रश्न असेल. हेच प्रयत्न चंद्रशेखर राव यांच्यामार्फत सुरू असावेत अशीही वंदता आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर केंद्रात सरकार स्थापन करणे हे कोणत्याही पक्षासाठी एक मोठे दिव्यच ठरू शकते अशी सारी स्थिती आहे. या अस्थिर परिस्थितीत कोणाचीही लॉटरी लागू शकते असे वातावरण तयार होत असल्याने आपणही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असे अनेकांना आता वाटू लागले असावे.
गेल्या पाच वर्षांत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील अनेक चमत्कार आपण पाहिले आहेत. गोवा आणि मणिपूरमध्ये हरलेल्या भाजपने तेथे सरकार स्थापन केलेले आपण पाहिले आहे. बिहारमध्ये पराभूत झालेली भाजप आज तेथील सरकारचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. ही सारी चमत्कारिक राजकीय स्थिती पाहिली तर केंद्रातही असेच काहीसे चमत्कारिक राजकारण पाहण्याची वेळ आपल्यावर आली तर ते आश्चर्याचे ठरणार नाही. सत्ता स्थापनेसाठीचे राजकीय चमत्कार काहीही होवोत, पण ते देशहिताच्या मुळावर येणारे नसावेत एवढीच अपेक्षा करणे आता लोकांच्या हातात उरणार आहे.