नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अजून काही दिवस बाकी असतानाच दिल्लीत पडद्या आडील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी याच अनुषंगाने मोठी धावाधाव सुरू केली असून त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. त्यांनी कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
केंद्रात बिगर भाजप आघाडीचे सरकार यावे यासाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्याच्या कामात ते या नेत्यांना राजी करीत आहेत. त्यासाठी आम आदमी पक्षालाही या व्यापक आघाडीत सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तत्पुर्वी चंद्राबाबूंनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही भेट घेतली.
राहुल यांच्याबरोबरच पवारांशीही गुप्तगु
चंद्रबाबू नायडू यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. भाजप किंवा एनडीएला बहुमत मिळाले नाही तरी सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नावाखाली मोदींनाच पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते अशा वेळी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे यावर चंद्राबाबूंनी या नेत्यांशी बोलताना खल सुरू केला असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी राहुल गांधी यांनाहीं अशी स्ट्रॅटेजी ठरवण्याची सुचना केली. भाजप विरोधी सरकार स्थापन करण्यासाठी सर्वच भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक प्लॅटफॉर्म आधी तयार केला पाहिजे असा प्रयत्न त्यांच्या मार्फत सुरू आहे. नायडू यांनी आज कम्युनिस्ट पक्षाचे जी सुधाकर रेड्डी, डी राजा, शरद यादव यांच्याशीही चर्चा केली. संध्याकाळी ते मायावती आणि अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करण्यासाठी लखनौला रवाना होत आहेत.
त्रिशंकु संसद अस्त्विात आली तर भाजपला सरकार स्थापनेसाठी हालचाल करण्याची संधी मिळण्या आधीच भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा चंद्राबाबुंचा हा प्रयास असून त्यांच्या प्रयत्नांना कॉंग्रेसचीही सध्या चांगली साथ मिळत आहे.