सर्व परवानग्या घेतल्या असल्याचा तेलगु देसम पक्षाचा दावा
अमरावती – कृष्णा नदीच्या काठावर बांधण्यात आलेला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे निवासस्थान बेकायदा नसल्याचा दावा तेलगु देसम पार्टीने केला आहे. तत्कालीन वाय.एस.राजशेखर रेड्डी सरकारनेच बंगला बांधण्यासाठी परवानगी दिली होती. सध्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वडिलांनीच या परवानग्या दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या परवानग्या बेकायदा होत्या हे जगनमोहन यांना जगाला सांगायचे आहे का? असा सवाल टीडीपीने केला आहे.
नायडू यांचा बंगला जमीनदोस्त करण्यासाठी राज्य सरकारने ज्या पद्धतीचे प्रयत्न करत आहे त्याचा टीडीपीने निषेध केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी जगनमोहन यांच्यावर टीका करताना नायडूंना शेवटपर्यंत लढण्याचा सल्ला दिला. नायडूंनी तत्काळ बंगला सोडण्याची आवश्यकता नाही. जर त्यांनी असे केले तर ते बेकायदा निवासस्थानी राहात होते असे लोकांना वाटेल. चंद्राबाबू नायडू आणि टीडीपी कार्यकर्त्यांना सतावण्यासाठी जगनमोहन रेड्डी सत्तेचा गैरवापर करत आहेत, असे टीडीपीचे नेते के.अच्चान नायडू म्हणाले. 2008 मध्ये ग्रामपंचायतीने इमारतीला परवानगी दिली होती.