भिंड – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशातील भिंड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, “‘चौकीदार चोर है’ ही घोषणा ना काँग्रेसची आहे ना माझी” अशी भूमिका घेतली. याबाबत सविस्तर वृत्त असे की काँग्रेस अध्यक्षांनी भिंड येथे एका जाहीर सभेमध्ये ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा कशाप्रकारे अस्तित्वात आली याबाबत खुलासा केला आहे.
याबाबत सांगताना ते म्हणाले की, “मला आज काही माध्यम प्रतिनिधींनी ‘चौकीदार ही चोर है’ या घोषणेची निर्मिती कोणी केली असा प्रश्न विचारला. मुळात ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केली नाही. मी एकदा छत्तीसगढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना म्हणालो होतो की, ‘चौकीदाराने २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिलं होतं, १५ लाख खात्यावर जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं’ मी बोलत असतानाच सभेला आलेल्या १० ते १५ तरुणांनी ‘चोर है’ असा नारा दिला. मी ते काय म्हणतायेत हे ऐकू न शकल्याने मी त्यांना पुन्हा एकदा घोषणा द्यायला सांगितले आणि ‘चौकीदार चोर है’ या घोषणेची निर्मिती झाली.”
“सभेला आलेल्या तरुणांनी ‘चौकीदार चोर है’ या घोषणेची निर्मिती केली असून ही घोषणा या देशातील तरुणांची, शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची आहे” असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
काँग्रेसद्वारे आपल्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘न्याय’ योजनेबाबत बोलताना गांधी म्हणाले की, “मी खोटी आश्वासने देण्यापेक्षा मरण पसंत करेन. न्याय योजना लागू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.”