नवी दिल्ली – देशातील प्रसार माध्यमांवर सरकारने दबाव आणला असून त्यांना सरकारने आपल्या धाकात ठेवले असल्याचा आरोप लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे. शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित करताना सांगितले की सरकारी जाहीरातींचा शस्त्रासारखा वापर करून सरकारने प्रसार माध्यमांना आपल्या दबावाखाली ठेवले आहे.
त्यांनी हा आरोप करताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आरडाओरड करून त्यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर सभापतींनी पुढील विषय पुकारल्यानंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला. चौधरी यांना या विषयावर आणखी बोलायचे आहे असा आग्रह कॉंग्रेस सदस्यांनी धरला. पण त्यांना त्यावर अधिक बोलू दिले गेले नाही. प्रसार माध्यमांमध्ये विरोधी पक्षांच्या मतांना पुरेसे स्थानच दिले जात नसून तेथे केवळ भाजपचीच हुजरेगीरी सुरू असल्याचा आरोप काही कॉंग्रेस सदस्यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.