नवी दिल्ली – लष्करासाठी “टी-90′ बनावटीच्या 464 रणगाड्यांच्या खरेदीला केंद्र सरकारने आज मंजूरी दिली. हे रणगाडे पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्धभूमीवर तैनात केले जाणार आहेत. सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीमध्ये 464 रणगाड्यांच्या खरेदीला मंजूरी देण्यात आली. या रणगाड्यांची अंदाजे किंमत 13 हजार कोटी रुपये आहे, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. “मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत चेन्नईजवळच्या अवडी इथल्या “हेवी व्हेईकल्स फॅक्टरी’मध्ये या रणगाड्यांचे उत्पादन केले जाणार आहे.
या रणगाड्यांमुळे सध्याच्या “टी-90′ च्या ताफ्यात 10 नवीन युनिटची भर पडणार आहे. हे रणगाडे रात्रीच्यावेळी शत्रूचे नेमके ठिकाण दर्शवण्याची क्षमता असलेले असणार आहेत. राजस्थान आणि पंजाबमध्ये यापूर्वीच “टी-90 रणगाड्यांच्या 18 रेजिमेंट तैनात करण्यात आल्या आहेत.