कोपरगाव येथे वृक्षारोपण करून दिल्या ईदच्या शुभेच्छा
कोपरगाव – मुस्लीम बांधवांमध्ये रमजान ईद सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. सुख-दु:ख हे जीवनाची वेगवेगळी प्रतीके जरी असली, तरी परिसरातील प्रत्येक व्यक्ती ईद सणाला आनंदी असली पाहिजे, यासाठी इस्लामने जी शिकवण दिली आहे, ती कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव शहर व तालुक्यात रमजान ईद सण साजरा करण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. या सोहळ्यास सर्वधर्मीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्वश्री कैलास जाधव, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, करीम कुरेशी, सद्दाम हुसेन, फिरोज पठाण, संचालक प्रदीप नवले, नगरसेवक जनार्दन कदम, अल्ताफ कुरेशी, शिवाजी खांडेकर, असलम शेख, वैभव गिरमे, मौलाना, बाळासाहेब आढाव, राजू पठाण, फकीर महंमद पहिलवान यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील प्रत्येक मशिदीत सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे सर्व आजी माजी संचालकांनी मुस्लीम बांधवांबरोबर हजेरी लावत रमजान ईद साजरी केली.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आमदार कोल्हे यांनी संजीवनी उद्योगसमूह परिसरात वृक्षारोपण करत ईदचा आनंद साजरा केला. आमदार कोल्हे म्हणाल्या, यंदाचा दुष्काळ मोठा आहे. त्यात मुस्लीम बांधवांनी, महिलांनी खडतर उपवास केले. मुस्लीम बांधवांच्या प्रगतीसाठी संजीवनी उद्योगसमूहाने आजवर अनेक उपक्रम राबवून सहकार्याची भावना ठेवलेली आहे.
कोपरगाव शहराला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, म्हणून थेट निळवंडेतून पाइपलाइन कामास मंजुरी मिळविली आहे. साठवण तलाव अपुरे पडत आहेत. तरीही त्यावर शाश्वत उपाययोजना करून कुठलाही दुजाभाव त्यात आणला जात नाही. मात्र विरोधाला विरोध म्हणून कोल्हे कुटुंबीयांना लक्ष करून स्वार्थ साधण्याची प्रक्रिया सध्या शहरात सुरू आहे. मात्र सुजाण नागरिक हे जाणून आहेत, असे त्या म्हणाल्या. गटनेते रवींद्र पाठक यांनी आभार मानले.