मुंबई: देशातील मतदान प्रक्रियेबबात एक साशंकता असून याबाबत अनेक पक्षांकडून वारंवार विरोध दर्शवला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील मतदान प्रक्रियेविषयी भाष्य केले आहे. ईव्हीएम मशीन बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, त्यामुळे बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू करायला हवी, असे मत भुजबळ यांनी मांडले.
डिजिटल यंत्रणेवर माझा विश्वास नाही, मोबाईल हॅक होऊ शकतात तर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ज्या देशांनी ईव्हीएम तयार केले त्यांनीही मतदानप्रणालीत बदल केला मग आपण का करत नाही? अशीही विचारणा भुजबळ यांनी केली.
तसेच देशात अघोषीत आणीबाणी असल्याचं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती, मात्र आता त्या लाटे विरोधात लाट आहे. नरेंद्र मोदींविरोधात देशभरात असंतोष पसरला असल्याचे भुजबळ म्हणाले.