लोणंद – भेटी लागे जीवा, लागलेसी आस’ या उक्तीप्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर माऊली, संत श्री तुकाराम महाराज आणि इतर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यांचे विठ्ठल दर्शन झाल्यानंतर सर्व पालख्यांचा आपापल्या ठिकाणांकडे परतीचा प्रवास सुरु झाला आहे.
पंढरपूरहून आळंदीकडे मार्गस्थ झालेली माऊलींची पालखी आज रविवारी पाडेगाव (ता. फलटण) येथे जिल्ह्यातील परतीच्या प्रवासातील शेवटच्या मुक्कामी येत आहे. त्या निमित्ताने पाडेगाव येथील वारकरी निवास सुसज्ज ठेवण्यात आले आहे. आज रात्रीचा मुक्काम आटोपून त्यानंतर उद्या सकाळी तो पुणे जिल्ह्यातील निरा या ठिकाणी सकाळच्या विसाव्यासाठी रवाना होणार आहे.