पाटण – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये समाविष्ट असलेल्या पाटण तालुक्यातील मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांच्या पर्यायी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला आहे. या गावांना स्थलांतरित करण्याच्या कारणावरून विकासापासून वंचित ठेवल्यामुळे तिन्ही गावातील लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ पर्यायी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा पवित्रा तीनही गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
याबाबतचे निवेदन मळे, कोळणे, पाथरपुंज या गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभुराजे देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की मळे, कोळणे पाथरपुंज ही तीन अतिदुर्गम गावे आजपर्यंत अभयारण्यात वास्तव्य करीत आहेत. सन 2004 पासून हे उद्यान सह्याद्री व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित झाले असल्याने या गावांचे पुनर्वसन गरजेचे असल्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र स्थलांतर करण्याच्या कारणावरून गावातील जनतेला 18 नागरी सुविधांपासून आजपर्यंत वंचित ठेवण्यात आले आहे.
अनेक वर्षापासून कसत असलेली शेती कसू देऊ नये असे महाराष्ट्र शासनाने वनविभागास कळविले आहे. गावांचा उदरनिर्वाह बंद झाल्याने जीवन-मरणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकवेळा आंदोलनाचा इशारा देवूनही शासनाने आजअखेर न्याय दिला गेलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनावर भरत चाळके, भास्कर चाळके, चंद्रकांत चाळके, अंकुश पवार, संपत पवार, संजय कांबळे, पांडुरंग डांगरे, लक्ष्मण जाधव, प्रकाश जाधव यांच्या सह मळे, कोळणे, पाथरपुंज या गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.