90 टक्के गळती रोखण्यात यश
जलसंपदा अधिकाऱ्यांचा दावा
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर (ता.मुळशी) धरणाच्या भिंतीतून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामांना यश येत आहे. हे टेमघर धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा अधिकाऱ्यांनी केला आहे. यंदा धरणात पावसाचे पाणी आल्यामुळे प्रशासनाने कामाची चाचणी घेतली. यामध्ये 2016 आणि आताची गळती याचा विचार करता, ती रोखण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे.
टेमघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी ही माहिती दिली. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षणे, कनिष्ठ अभियंता सुधीर अत्रे, सहायक अभियंता संदीप शिंदे उपस्थित होते.
टेमघरचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून पाणीसाठा सुरू झाला. मात्र, अवघ्या दोन ते तीन वर्षांतच धरणातून गळती सुरू झाली. 2016 साली धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती.
याचे प्रमाण प्रति सेंकद
2 हजार 587 लिटर एवढे होते. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही गळती रोखण्यासाठी सेवानिवृत्त सचिव व्ही. एम. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली. समितीने पाणी गळती रोखण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या.
त्यानुसार गळती रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रायमरी आणि सेंकडरी “ग्राऊटींग’ म्हणजे धरणाच्या भिंतीमध्ये सिमेंट, फ्लाय ऍश आणि सिलिका यांचे मिश्रण एका विशिष्ट दाबाने सोडण्यात आले. त्यामुळे पोकळ्या भरुन आल्या असून भिंतीला मजबुती आल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामानेच गळतीचे प्रमाण 90 टक्के कमी झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामामध्ये धरणाच्या पाण्याच्या बाजूच्या भिंतीला फायबर आणि विशिष्ट केमिकलचा लेप देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यात यश येईल, असे कोल्हे यांनी सांगितले.
अत्याधुनिक पद्धतीने काम
टेमघरच्या कामाला 1997 मध्ये सुरूवात झाली होती. 2000मध्ये हे काम 90 टक्के पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊटिंग शिल्लक होते. मात्र, त्याच वेळी वन आणि जलसंपदा विभागात सात एकर जागेवरुन वाद होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले. वनविभागाने हे काम थांबविले. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. त्या वेळी ग्राऊटिंग न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच हे धरण गळू लागले. मात्र, सध्याची दुरुस्ती काम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. केंद्रीय जल व उर्जा संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आल्याचे कोल्हे म्हणाले.