2005 मध्ये आलेल्या “बंटी और बबली’ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या केमिस्ट्रीने आणि त्यांनी सगळ्यांना उल्लू बनवण्यासाठी वापरलेल्या फंड्याने पब्लिक येकदम खूष झालं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या मागावर असलेले स्वतः बिग बी आणि “कजरा रे..’ म्हणणारी ऐश्वर्या यामुळे या सिनेमाची चलती गाडी एकदम बुंगाट सुटली होती.
आता याच “बंटी और बबली’ला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शाद अली यांच्या डायरेक्शनखाली या सिक्वेलचे शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर “बंटी और बबली’मधील केवळ अमिताभ बच्चन यांच्याच नावाने दरवर्षी 1-2 सिनेमे झळकत आहेत. अभिषेक, ऐश्वर्या आणि राणी मुखर्जी यांनी तर गेल्या 10 वर्षांपासून जणू काही करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. अलिकडच्या काळात त्यांचे कोणतेच सिनेमे रिलीज झालेले नाहीत.
सध्या राणी मुखर्जी “मर्दानी -2’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 2014 मध्ये आलेल्या तिच्या “मर्दानी’चा हा दुसरा भाग असणार आहे. मुंबई पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत राणी पुन्हा एकदा दिसणार आहे. तर अभिषेकने अनुराग कश्यपच्या “मनमर्जियां’मध्ये काम केले होते. त्यामधील त्याच्या रोलची विशेष चर्चाच झाली नव्हती. त्यामुळे हा सिनेमा त्याचा होता, हेच कोणाला आठवत नसेल. ऐश्वर्याही आता पुन्हा बॉलिवूडमध्ये ऍक्टिव्ह होण्याच्या तयारीत आहे. कृष्णमूर्ती कल्की लिखीत एका कादंबरीवर मणिरत्नम सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी ऐश्वर्याला कास्ट केले आहे, असे समजले आहे. आता “बंटी ऑर बबली 2’मध्ये “कजरारे कजरारे…’ म्हणायला ऐश्वर्या आहे की नाही हे नाही समजले.