-अनेक ठिकाणी फांद्या कोसळल्या तर काही वृक्ष उन्मळून पडले
-धोकादायक वृक्षांची उद्यान विभागाकडून छाटणी नाही
पिंपरी – गेल्या दोन दिवसांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सुसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे पन्नास झाडांचे नुकसान झाले. त्यापैकी सुमारे 20 वृक्ष भुईसपाट झाले आहेत. शहरातील विविध भागातील जुने व जीर्ण झालेले वृक्ष वाऱ्याचा जोर सहन करु शकले नाहीत. यामुळे ठिकठिकाणी झाडाच्या मोठ-मोठ्या फांद्या तर काही ठिकाणी झाडेच उन्मळून पडली होती. अग्निशामक विभाग आणि उद्यान विभागाडून रस्त्यात पडलेली झाडे आणि फांद्या काढून रस्ता मोकळा करण्यात येत आहे.
उद्यान विभागाकडून पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी होणे आवश्यक असते. मात्र, जोपर्यंत नागरिकांकडून तक्रार येत नाही, तोपर्यंत छाटणी केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने यंदा देखील चांगलाच जोर दाखवला. प्रचंड धूळ उडवत सैरा-वैरा धावणाऱ्या वादळाच्या कचाट्यात सापडलेले जीर्ण वृक्ष आणि कमकुवत फांद्या तग धरु शकल्या नाहीत. वादळ-वाऱ्याची सर्वाधिक झळ शहरातील झाडांना बसली असून दोन दिवसात उद्यान विभागाच्या अधिकृत अकडेवारीनूसार शहरातील विविध भागातील 50 झाडे कोलमडून पडली आहे. यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. झाडे आणि फांद्या हटविण्यासाठी उद्यान विभागाकडून 20 कर्मचारी नेमण्यात आले असून झाडांच्या फांद्या बाजूला केल्या जात असल्याची माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, शहरातील काही धोकादायक झाडे अजूनही त्याच अवस्थेत असून उद्यान विभागाकडून त्यांची छाटणी केली जात नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्यान विभागाचे वृक्ष अधिक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील शाहूनगर, पिंपरी, पिंपरीगाव, भाटनगर, मासूळकर कॉलनी, कृष्णानगर, प्राधिकरण आदी भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पडलेल्या वृक्षांना रस्त्याच्या कडेला करुन नंतर त्याचा पालापाचोळा कचरा डेपो येथे नेण्यात येणार आहे.
शोभिवंत वृक्षांची वाताहत
जोरदार वारा व त्याबरोबर पडलेल्या पावसामुळे शहरातील वृक्ष व त्यांच्या फांद्या पडल्या आहेत. कोसळणाऱ्या झाडांमध्ये सर्वाधिक संख्या ही विदेशी शोभिवंत वृक्षांची आहे. जीर्ण झालेल्या व धोकादायक वृक्षाची छाटणी वेळीच केली तर, संभाव्य धोका टाळता येवू शकतो. शोभिवंत वृक्ष हे टिकाऊ नसतात आणि केव्हाही कोसळू शकतात, यामुळे पक्षी कधीही शोभिवंत झाडांवर आपली घरटी बांधत नाहीत. याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा आला आहे. यामुळे स्थानिक देशी आणि दीर्घायुषी झाडे लावण्यावर भर देण्यास पर्यावरण तज्ञांकडून सांगण्यात येते.