पाण्याअभावी पोल्ट्रीशेड बंद असल्याचा परिणाम
मंचर – पाण्याअभावी पोल्ट्रीशेड बंद असल्याने बॉयलर कोंबडीचे दर कडाडले आहेत. लग्नसराई, वाढदिवस यामुळे बॉयलर चिकनला मागणी वाढली असून पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आंबेगाव तालुक्यात चिकनचे दर वाढले आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने पोल्ट्रीशेड पाण्याअभावी बंद ठेवण्याची वेळ पोल्ट्रीचालकांवर आली आहे. पोल्ट्रीशेड बंद असल्याने कोंबड्यांचे बाजारभाव कडाडले आहेत. पोल्ट्री संगोपन करणाऱ्या पोल्ट्री कंपन्या 106 ते 107 रुपये किलो होलसेल दराने बॉयलर कोंबडी किरकोळ व्यापाऱ्यांना विकत आहेत. किरकोळ विक्रेते ग्राहकांना 200 ते 210 रुपये दराने बॉयलय कोंबडी विकत आहेत. पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना कोंबड्यांना पाणी कुठून आणणार हा प्रश्न पोल्टीचालक शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पोल्टीचालक हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी पोल्टीचालक पत्र्यांच्या शेडवरती पाचट टाकून स्प्रिंकलरद्वारे पाण्याची फवारणी करीत आहेत.
किरकोळ व्यवसाय करणारे व्यवसायिक पक्षांची मर होऊ नये, याकरिता दिवसातून दोन-तीन वेळा कोंबड्यांवर पाणी मारत आहेत. उष्णतेची तीव्रता मोठी असल्याने कोंबड्या मृत पावण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पोल्ट्रीशेड बंद असल्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यासाठी झाला आहे.
लग्नसराईचा हंगाम आणि उन्हाळी सुट्यांमुळे चिकनला मागणी वाढली आहे. मालाचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने बॉयलर कोंबडीचे लिफ्टींग रेटने शंभरी गाठली आहे. चिकन व्यवसायिक सध्या 200 ते 210 रुपये किलो दराने विक्री करीत आहेत, असे ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी सांगितले.