12 वा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित केला गेला आहे. ज्यात 10 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हा विश्वचषक 48 दिवस चालणार आहे. यावेळी भारतीय संघाने विश्वचषक सुरू झाल्यानंतर तब्बल आठवडाभराने आपला पहिला सामना खेळला असला तरी विश्वचषकातील पहिल्या सामन्यापासून मैदानांच्या तिकीट खिडकीवर भारतीय प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांचा या विश्वचषकाला बराच आधार असल्याचे दिसून येते आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेला सामना हा साऊथहॅम्प्टन येथील मैदानावर झाला. ज्याची प्रेक्षक मर्यादा ही 25000 होती. या प्रेक्षकांपैकी जवळपास 80 टक्के प्रेक्षक हे भारतीय होते. ज्यामुळे विश्वचषकाची सुरुवात ही काल झाल्याचा आभास निर्माण झाला होता. केवळ कालच्याच सामन्यातच नाही तर सुरुवातीपासूनच्या सामन्यांना देखील भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त होती.
त्यातच भारताच्या पहिल्या सामन्याच्या वेळी साऊथहॅप्टनच्या बस स्टेशन, रेल्वे स्टेशन आणि हॉटेल्स भारतीय चाहत्यांनी भरून वाहत होते. यावेळी साऊथहॅम्पटन येथील मिडानबुरी, वूलस्टोन, शोलिंग या ठिकाणी भारतीय व्यक्तींचे प्रमाण अधिक असल्याने आजच्या सामन्याला त्यांची गर्दी अपेक्षितच होती. त्याच प्रमाणे येथून येणारे चाहते मुख्यत्वे हातात तिरंगा, भारतीय संघाच्या जुन्या, नव्या जर्सी सह मैदानाकडे दाखल होताना दिसून आले.
केवळ स्थानिकच नाही तर परदेशातील भारतीय नागरिकांसोबत लंडन आणि लिडस येथील भारतीय चाहत्यांनी देखील मैदानात हजेरी लावल्याने भारतीय संघाचे पाठीराखे संघाला सपोर्ट करण्यासाठी काहीही करू शकतात याचा प्रत्यय कालच्या सामन्याच्या वेळी आला. त्यातच भारतीय संघाचे आगामी सामने हे लंडन, बर्मिंगहॅम, नॉटिंगहम या ठिकाणी आहेत. या सर्व ठिकाणी अनिवासी भारतीयांची संख्या इतर देशांच्या तुलनेत अधीक असून या ठिकाणी होणाऱ्या सामन्यांना भारतीय प्रेक्षकसंख्या वाढण्याची शक्यता अधिक असल्याचाही अनुमान आयसीसीने लावला आहे.
त्यातच विश्वचषकाचे अर्थकारण पाहाता आयसीसीने सर्व सामन्यांसाठीच्या तिकीट दरांमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्यांसाठीचे तिकीट दर जादा ठेवले असून इतर संघांच्या सामन्यासाठी तिकीट दर हे कमी आहेत. यावरून विश्वचषकाला भारतीय प्रेक्षकांचा आधार अधिक असल्याचे दिसून येत आहे.
-आनंद गावरस्कर