कोल्हापूर : राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे.
महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध फलक हातात घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी आज, मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विराट मोर्चा’ काढण्यात आला. दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे.
या मोर्चात भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा जाणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा होणार असून भाजपचे राज्यभरातील नेते मार्गदर्शन केले.
कर्जमाफीची घाईघाईने घोषणा करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व दोन लाखावर तसेच शेतीपूरक मध्यम मुदत कर्जबाबत काही निर्णय घेतले नाहीत सरसकट कर्जमाफी ही शब्दरचना केवळ नावापुरतीच आहे.
साखर कारखाने, सूतगिरण्या नागरी बँका, बाजार समिती, जिल्हा बँक, या पदाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 25000 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आले आहे.
शेतकरी पात्र होण्यासाठी मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्जाचा फेरविचार करण्याची गरज आहे आदी मागन्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मोर्चात माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेतील गटनेते अरुण इंगवले, पक्ष परतोद विजय भोजे ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शोमिका महाडिक गोकुळचे संचालक बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, आदी मोर्चात सहभागी झाले होते.