एअर स्ट्राईकचा मतदारांवरील प्रभाव निवळू लागला
नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या न्याय योजनेमुळे भाजपाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. या किमान उत्पन्न योजनेमुळे (न्याय) भाजपाच्या 30 जागा कमी होऊ शकतात असे बोलले जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांची नाराजी असलेल्या भागांमध्ये न्याय योजना भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. त्यानंतर मोदींनी स्वतःला देशाचा चौकीदार म्हटले. मैं भी चौकीदार हे सोशल मीडिया कॅम्पेनदेखील भाजपाकडून राबविण्यात आले. एअर स्ट्राईकसारख्या धडक कारवाईचा निवडणुकीत फायदा होईल, अशी भाजपाला आशा होती. काही दिवस एअर स्ट्राईकमुळे भाजपाच्या जागा वाढतील, अशी स्थिती होती. मात्र त्याचा परिणाम लवकरच कमी
झाला आहे.
न्याय योजनेचा फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना होईल. या योजनेनंतर भाजपाने सर्वेक्षण केले असल्याचे बालले जाते. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भाजपाला 230-240 जागा मिळतील, असा अंदाज वाटत होता. मात्र आता त्यात 30 जागा कमी होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, झारखंड आणि दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणातही न्यायचा परिणाम जाणवेल, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली. मात्र सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशात न्यायचा परिणाम तितकासा जाणवणार नाही, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात अस्वस्थता आहे. मात्र या भागातील मतदार जातीपातीच्या राजकारणाला जास्त प्राधन्य देतात. त्यामुळे न्यायचा फारसा प्रभाव जाणवणार नाही, असे देखील सर्वेक्षण सांगत आहे. मात्र तेथे सपा व बसपाची युती निवडणूक संयुक्तपणे लढवत आहे.