वंदना बर्वे
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने सतराव्या लोकसभेत भगवा फडकविण्यासाठी 13 राज्यातील 353 जागांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यांमध्ये 2014 च्या यशाची पुनरावृत्ती झाली तर केंद्रात सत्ता स्थापन करणे भाजपला सोपे जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 व्या लोकसभेत भाजपप्रणित रालोआची पूर्ण बहुमताची सरकार स्थापन होणार असल्याचा दावा करीत आहे. मात्र, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. मतदारांचे बदललेले मूड आणि विरोधकांची एकजूट लक्षात घेता भाजपला तगड्या आव्हानाचा सामना करावा लागेल, असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. भाजपसाठी 13 राज्यांतील 353 जागा खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले तर भाजपला कुणीही थांबवू शकणार नाही. 2014 मध्ये रालोआने या राज्यांतील 74 टक्के जागांवर विजय मिळविला होता. विश्लेषकांनुसार 13 राज्यांची तीन भागात विभागणी केली जावू शकते.
पहिल्या श्रेणीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि झारखंडचा समावेश आहे. या राज्यांतील 162 जागांवर रालोआ आणि संपुआत थेट लढाई आहे. 2014 मध्ये रालोआने 162 पैकी 151 जागांवर विजय मिळविला होता. अशात, गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती करायचे असेल तर 2014 च्या मतदारांना कॉंग्रेसप्रणित आघाडीकडे जाण्यापासून रोखण्याची आहे. महाराष्ट्र सोडला तर भाजपने अन्य राज्यांमध्ये एकट्याने निवडणूक लढविली होती. तर कॉंग्रेसने महाराष्ट्र, गुजरात आणि झारखंडमध्ये आघाडी केली होती. तरीसुध्दा, रालोआचा व्होटींग शेअर संपुआपेक्षा खूप जास्त होते. दुसाया श्रेणीत उत्तरप्रदेश, बिहार आणि कर्नाटक ही तीन राज्ये आहेत. 2014 च्या निवडणुकीत रालोआने येथील 148 पैकी 121 जागांवर विजय मिळविला होता. यूपीत लोकसभा आणि 2017 मधील मतांची टक्केवारी भाजप आणि सपा-बसपाच्या बरोबर होती.
तिसाया श्रेणीत पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना ठेवण्यात आले आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला या दोन्ही राज्यांमधील 63 पैकी फक्त तीन जागांवर विजय मिळाला होता. मात्र, या निवडणुकीत दोन्ही राज्यांतील मतदार आपल्या झोळीत भरभरून मतदान करणार असल्याचा विश्वास भाजपला आहे. भाजपने सुध्दा या सर्व जागांवर विशेष लक्ष दिले आहे.