चेन्नई -तामीळनाडू भाजपच्या अध्यक्षा तामीळीसाई सुंदरराजन यांनी मंगळवारी सनसनाटी दावा करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. द्रमुक हा कॉंग्रेसचा मित्रपक्ष भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी तो दावा फेटाळून लावत सुंदरराजन यांनी सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, असे आव्हान दिले.
लोकसभा निवडणुकीसाठी तामीळनाडूत भाजपने अण्णाद्रमुकशी तर कॉंग्रेसने द्रमुकशी आघाडी केली आहे. मात्र, निवडणुकीनंतर बरोबर येण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी द्रमुक हा पक्ष भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हणत सुंदरराजन यांनी धमाल उडवून दिली. तुतीकोरीनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी संबंधित दावा केला. द्रमुक रंग बदलतो हे सर्वांनाच ठाऊक आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
त्यानंतर सुंदरराजन यांच्या वक्तव्यावरून स्टॅलिन यांनी पलटवार केला. पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असल्याने भाजप गोंधळाची स्थिती निर्माण करत आहे. केंद्राच्या सत्तेतून मोदी सरकारला बाहेर घालवण्याची मोहीम मी पुढे नेत आहे. विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव पुढे केले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.