तीन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा फटका
रांची – देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून झारखंडतील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या 14 लोकसभा मतदारसंघात भाजप 10 जागांवर, कॉंग्रेस 3 जागांवर तर इतर एका जागेवर आघाडी घेताना दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबु सोरेन यांच्याविरोधात भाजपच्या सुनिल सोरेन यांनी 17 हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळवले. तर आणखी एक माजी मुख्यमंत्री आणि झारखंड विकास मोर्चा – प्रजातांत्रिक पार्टीचे प्रमुख बाबूलाल मरांडी यांच्यावर भाजपच्या अन्नपूर्णा देवी यांनी तब्बल 70 हजारापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे तिसरे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खुती येथील उमेदवार अर्जुन मुंडा यांची कॉंग्रेसचे उमेदवार कालिचरण मुंडा यांच्याशी जोरदार चुरस झाली. अर्जुन मुंडा हे अवघ्या 600 मतांनी पिछाडीवर होते..
केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कॉंग्रेसच्या गोपाल साहू यांच्यावर 50 हजारापेक्षा अधिक मतांनी विजय मिळाला आहे. राजधानी रांचीमध्ये भाजपच्या संजय सेठ यांनीही 50 हजार मतांनी विजय मिळवला आहे.