जम्मू – भारतीय जनता पार्टीने गेली अनेक दशके काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे घटनेतील कलम 370 रद्द करावे अशी मागणी लाऊन धरली होती. आज मोदी सरकारला प्रचंड बहुमताने पुन्हा सत्ता मिळाल्याने आता लवकरच हीं मागणी पुर्ण केली जाईल असे संकेत भाजपकडून दिले जात आहेत. जम्मू काश्मीरप्रदेश भाजप अध्यक्ष रविंद्र रैना यांनी आज येथे बोलताना हे संकेत दिले. ते म्हणाले की कलम 35 ए पण लवकरच रद्द करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्या खेरीज पाकिस्तान व्याप्त काश्मीरातून आलेल्या निर्वासितांसाठी या राज्यातील विधानसभेत आठ जागा आहेत त्याही गोठवण्याचा आमचा प्रस्ताव आहे असे ते म्हणाले.
आज येथे पत्रकारांशी बोलताना रैना म्हणाले की घटनेच्या कलम 370 मधील तरतूदी या जम्मू काश्मीर मधील लोकांवरच अन्याय करणाऱ्या आहेत. ते घटनेचे 35 ए हे कलम तर भयंकर प्रकरण आहे. संसदेची अनुमती न घेता राष्ट्रपतींच्या संमतीने मागच्या दाराने ते घटनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या सगळ्या तरतूदी शक्य तितक्या लवकरन नाहीशा करावच्यात अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.
सर्व काश्मीरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन ही आमची आणखी एक प्रमुख मागणी आहे असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान गेल्या शुक्रवारीच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ फारूख अब्दुल्ला यांनी मोदी सरकार कितीही शक्तीशाली झाले तरी घटनेचे कलम 370 आणि 35 ए रद्द करू शकत नाही असे म्हटले आहे