केंद्रपाडा – संपुर्ण देशात आमचीच लाट असून भाजपच्या लाटेने उभ्या केलेल्या या आव्हानामुळे विरोधकांची झोप उडाली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे. आज येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. येथील मतदारांनी दोन्ही हाताने कमळाचेच बटन दाबावे एका हाताने लोकसभेसाठी आणि दुसऱ्या हाताने विधानसभेसाठी आम्हाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
लहर नही ये ललकार है फिर एकबार मोदी सरकार है अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली. सन 2014 साली लोकांचा मला जेव्हढा पाठिंबा आणि प्रेम मिळाले नव्हते ते यावेळी मला मिळाले आहे असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमधून मिळालेले संकेत हे आमचेच सरकार पुन्हा येणार याचेच आहेत असे त्यांनी नमूद केले.
आमच्या सरकारवर गेल्या पाच वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. ज्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले तेच फसले असे ते म्हणाले. या खोटारड्यांना मतदार आता धडा शिकवणार आहेत. याची जाणीव त्यांनाही झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस व अन्य पक्षांना शॉक बसला आहे असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि ओडिशा सरकार हे एकाच विचाराचे असतील तर या राज्याची प्रगती वेगाने होईल त्यामुळे ओडिशातही लोकांनी भाजपचेच सरकार निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. या राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले.