चौकशीची केली मागणी
मुंबई – भिवंडीमध्ये ईव्हिएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमबाहेर होमहवन आणि जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशी काळीविद्या करणाऱ्यांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले असून त्यामागे भाजपावर संशय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजपाकडून सर्व हातखंडे वापरले जात असल्याचा आरोप करतानाच या जादूटोण्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्रॉंगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करत असताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले. पकडलेल्या लोकांकडे जादूटोण्याचे साहित्य कसे आले व या लोकांशी भाजपचा संबंध काय आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.
पराभवाच्या भितीतून भाजप नेते बेताल वक्तव्य करत सुटलेत. विरोधी आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच सरकारी यंत्रणांची गळचेपी करणे, त्यांच्यावर दबाव टाकण्यापर्यंत भाजपाची मजल गेली आहे. जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा भाजपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. काळी जादू करण्यापर्यंत मजल जावी, हा अघोरी प्रकार धक्कादायक असून डोक्याला हात लावून घेण्यासारखे आहे. भाजपाची विचारधारा ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.