शेवगाव – राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले. राष्ट्रवादीच्या चुकीचे हे फळ आहे असे सांगून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली.
वंचित बहुजन आघाडीचे नगर लोकसभेचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे नेवासे रस्त्यालगत झालेल्या जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला राजकीय सद्यःस्थितीमध्ये बदल घडवायचा आहे. विकासाचे काम करायचे आहे. तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. त्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. ते करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.
सत्तेत असलेले भाजप सरकार हे ब्लॅकमेल करणारे सरकार आहे, तिकडे बीडमध्ये भाजपद्वारे मुंडे बहिणींचे ब्लॅकमेलिंग सुरू आहे, सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे, अशी टीका करून मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडी सोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार सुधाकर आव्हाड, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संजय सुखदान, किसन चव्हाण, अशोक सोनवणे उपस्थित होते.