बाळासाहेब थोरात ः अटकेच्या निषेधार्थ कॉंग्रेसची निदर्शने
योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन
मुंबई (प्रतिनिधी) – भाजप सरकार प्रियांका गांधी यांना घाबरत आहे, म्हणूनच सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्स समोर तीव्र निदर्शने केली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन, नाना पटोले, अनिस अहमद, आशिष दुआ, बी. एम. संदीप, सत्यजित तांबे, विलास औताडे, ऍड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृतीचा निषेध करत थोरात म्हणाले, उत्तर प्रदेशात गुन्हेगार खुलेआम हत्या करतायेत, दरोडे घालतायेत. समाजकंटक दंगली घडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी उत्तर प्रदेश पोलीस विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक का करत आहेत? असा सवाल करीत उत्तर प्रदेशात सर्वसामान्यांच्या हक्कांची गळचेपी सुरु असून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु असल्याचा आरोप थोरात यांनी केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी नेत्यांना अटक करण्याऐवजी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.