भुवनेश्वर -फणी वादळाने अलिकडेच ओडिशा राज्याला जोरदार तडाखा दिला. त्या तडाख्याने राजकीय उलथापालथी होण्याचीही चिन्हे आहेत. ते वादळ भाजप आणि बिजदला जवळ आणत असल्याचे संकेत मिळत आहेत. फणी वादळामुळे ओडिशात 64 जण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, 5 लाख कुटूंबे बेघर झाली. वादळाच्या तडाख्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील काही भागांची हवाई पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजदचे प्रमुख नवीन पटनाईक यांची प्रशंसा केली.
आता पटनाईक यांनी मोदींना पत्र पाठवून वादळानंतरची स्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. दोन्ही नेत्यांची एकमेकांची केलेली स्तुती हा ओडिशात चर्चेचा विषय बनला आहे. प्रचार काळात एकमेकांवर जोरदार प्रहार करणारे भाजप आणि बिजद या पक्षांचे मन आता बदलल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पटनाईक यांनी भाजप आणि कॉंग्रेसला समान अंतरावर ठेवण्याचे धोरण बदलण्याची तयारी दर्शवली होती. ओडिशाचे हितरक्षण करणाऱ्यांना बिजद पाठिंबा देईल, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता बिजदचा कल भाजपकडे झुकू लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे.