मुंबई – “मी टू’ मोहिमेंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनीभा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, “मी टू’ मोहिमेंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या अनेक गंभीर आरोपांना नाना पाटेकर यांनी फेटाळून लावल्यानंतरही नानांसोबत काम करण्यास “हाऊसफुल’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नकार दिला होता. या आरोपांनंतर अद्याप नाना हिंदी चित्रपटात दिसले नाहीत. पण ते लवकरच तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. तेलगू चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नाना दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या “नन्ना नेनू’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.