मॅंचेस्टर – भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर हा दुखापतीमुळे आगामी दोन-तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या पायास दुखापत झाली होती. त्याने 4.2 षटके टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले होते. त्याचे उर्वरित षटक विजय शंकर याने पूर्ण केले होते.
भारतास अव्वल साखळी गटात अफगाणिस्तान (22 जून), वेस्ट इंडिज (27 जून) व इंग्लंड (30 जून) यांच्याबरोबर खेळावे लागणार आहे. या तीन लढतींमध्ये भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमी याला संधी दिली जाणार आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना अपेक्षेइतका रोमहर्षक झाला नाही. त्याबाबत कोहली याने सांगितले की, 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पाकिस्तानने आमच्यावर सहज विजय मिळविला होता. या पराभवाचे सल अजूनही मनात होते. त्यामुळेच येथील सामन्यात त्यांची धूळधाण उडवायच्या हेतूने आम्ही उतरलो होतो.