मुंबई – लाव रे व्हिडिओ नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गाजर विवाह आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यानंतर आता मनसेने आपला रोख सोशल माध्यमांवर वळवत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
मनसे आणि नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांचा गाजर विवाह आयोजित केला आहे. मनसे कडून ही विवाह पत्रिका सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी मुंबई मध्ये मतदान होणार असून याच दिवशी मनसेने विवाहाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही पत्रिका चांगलीच चर्चेचा विषय झाली आहे.