तब्बल 24 तासांपेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित : दुरुस्ती सुरूच
दहा ते 15 लाखांचा महावितरण विभागाला फटका
18 खांब पडले; महावितरण विभागाचा खेळखंडोबा
महावितरणचा सारा पसारा उघड्यावर
महावितरण विभागाचा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. यावर्षी पहिल्याच पावसात मोठमोठे वृक्ष तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या पडून वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात राहतात.
नगर – नगर शहरासह भिंगार व परिसरात सोमवारी (दि.10) रोजी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्याने व विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. भिंगारकरांना मात्र, रात्र आंधारात काढावी लागली. तब्बल 24 तासापेक्षा जास्त विविध अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागला.
सोमवारी वादळी पावसाने नगर शहरात दाणादाण उडली. सोसाट्याच्या वाऱ्यात महावितरण विभागाचे नगर शहरात 27 मोठे खांब तर 440 व्होल्टचे 30 ते 35 खांब पडले आहेत. तर भिंगार शहरात तब्बल 18 खांब वाकले तर काही पडले आहेत. तसेच नगर शहरासह भिंगार परिसरातील अनेक घरांच्या सर्विसकेबल तुटल्याने नागरीकांना आंधारात राहावे लागले. त्यामुळे महावितरण विभागाल एकाच पावसात 10 ते 15 लाखाचा फटका बसला आहे.
मान्सून सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने महावितरण विभागास दिले होते. त्यानुसार संबंधित विभागाने लाईन खालची झाडे तोडली. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. तर काही ठिकाणी विद्युत वाहक तारा येकत्र झाल्याने विजेचा खेळ खंडोबा झाला. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्या होत्या. शहरास अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दोन ते तीन तासा पेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
अकोल्यात 86 पोल पडले
अकोले वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश बागुल यांच्याशी संपर्क केला असता या वादळामुळे 18 गावे प्रभावित झाली आहेत. मुख्य वाहिनीचे 48 आणि एलटी लाइनचे 86 पोल खाली पडले व त्यांच्या तारा तुटल्या. तर मेन लाइनचे उभ्या खांबांपैकी 32 खांब वाकले आणि एलटी लाइनचे 52 खांब वाकले असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यंत्रणा जोखमीची
रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही. त्याचे एकदा कनेक्शन घेतले की, त्याची सेवा संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून चालू किंवा बंद करता येते. तीही कोणत्या जोखमीशिवाय. मात्र, वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.
बिघाड शोधणे जिकिरीचे
वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.