भंडारदरा 7 तर निळवंडे, मुळामध्ये अवघा 5 टक्के जलसाठा
नगर: उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने आहे तेही पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. आजमितीला जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून आता सर्व मदार भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीन मोठ्या प्रकल्पांवरच आहे. त्यातही या प्रकल्पांमध्ये कधीनव्हे तो अतिशय अत्यल्प पाणीसाठा राहिला असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. भंडारदरामध्ये 7 तर निळवंडे, मुळा धरणांमध्ये प्रत्येकी 5 टक्के जलसाठा आहे.
हे तीन प्रकल्प सोडले तर आढळामध्ये 7 टक्के, विसापूरमध्ये कुकडीचे पाणी सोडण्यात आल्याने 7 टक्के तर खैरीमध्ये 3 टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील उर्वरित पाच मध्यम प्रकल्प व 72 लघु प्रकल्प गेल्या महिन्याभरापूर्वीच कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा जलसाठ्याचे चित्र गंभीर झाले आहे. या मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या पिण्यासाठी पाणी आहे. अर्थात हा उपयुक्त साठा आहे. काही प्रकल्पांमध्ये मृतसाठा आहे. परंतू त्यात मोठा गाळ असल्याने ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. पारनेर तालुक्यात 7 लघु तर 1 मध्यम प्रकल्प आहे. हे सर्वच कोरड पडले आहेत. पाथर्डी तालुक्यातील देखील सात लुघ व एक मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे. अकोले तालुक्यात 11 पैकी 3 प्रकल्पांमध्ये पाणीसाठा आहे.
एकूणच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांमधील जलसाठयावर संपूर्ण जिल्ह्याची यापुढे तहान भागणार आहे. त्यामुळे शहर भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कोपरगाव शहरात तब्बल पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्या तुलनेने नगर शहरात बऱ्यापैकी पाणीपुरवठा होत आहे. याची जाण ठेवून नगरकरांनी पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.