महापालिका आयुक्तांची माहिती; पोलीस आज ग्रामस्थांशी चर्चा करणार
पुणे – मागील दोन महिन्यांपासून बंद असलेले भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचे काम उद्या शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात सुरू केले जाणार आहे. या योजनेचे काम बंदोबस्तात सुरू करण्यासाठी महापालिकेत जिल्हा प्रशासन तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. त्यासाठीचे लेखी पत्रच महापालिकेने बुधवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास दिले आहे.
भामा-आसखेड धरणातून शहराच्या पूर्वभागासाठी सुमारे 2.56 टीएमसी पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून तब्बल 400 कोटी रुपये खर्चून ही योजना राबविली जात आहे. या योजनेस प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला असून आधी पुनर्वसन पूर्ण करावे आणि नंतरच योजना पूर्ण करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे राज्यशासनाने भामा-आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी 15 लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सुमारे 1,400 प्रकल्पग्रस्त असून त्यातील 388 प्रकल्पग्रस्तांनी शासनाने मोबदल्याऐवजी जमिनीची मागणी केली आहे. हा मोबदला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने द्यायचा असून ही रक्कम सुमारे 131 कोटींची आहे. हा मोबदला महापालिका देणार असल्याने शासनाने या दोन्ही महापालिकांकडे जलसंपदा विभागाने मागणी केलेला सुमारे 181 कोटींचा सिंचन पुन:स्थापना खर्च यापूर्वीच माफ केला आहे. ही मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच; या योजनेअंतर्गत वाकी तर्फे वाडा या गावात सुरू असलेल्या जॅकवेलचे काम 7 मार्चपासून ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. तसेच या योजनेसाठीच्या 1,700 मिमी जलवाहिनीचे शेवटच्या टप्प्यातील कामही बंद पाडले आहे.
ग्रामस्थांनी हे काम बंद पाडल्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे हे काम बंदच होते. मात्र, आता राज्यातील निवडणुका संपल्याने महापालिकेने तातडीने पोलीस बंदोबस्त मिळावा तसेच काम सुरू व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना साकडे घातले होते. त्यांनीही “आधी बैठक घ्यावी, नंतर ग्रामस्थांशी चर्चा करावी’ अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आयुक्त राव यांनी बुधवारी महापालिकेत बैठक बोलाविली होती. यात महापालिकेने उद्यापासूनच काम सुरू करण्याची मागणी केली. मात्र, यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यानी पोलीसांची कुमक उभारण्यासाठी एका दिवसाचा कालावधी जाईल, असे सांगत हे काम सुरू करण्यासाठी 10 मेपासून पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हे काम शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
पोलीस आज साधणार ग्रामस्थांशी संवाद
दरम्यान, पोलीस प्रशासन ग्रामस्थांशी गुरूवारी संवाद साधणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी त्यांना आंदोलन, राज्यशासन आणि न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र, काम बंद पाडण्याचा अधिकार नाही. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली जाणार आहे. तसेच कोणताही वाद न घालता हे काम सुरू करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत पोलिसांकडून ही माहिती प्रशासनास देण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थ तयार नसतील, तर नाईलाजास्तव बंदोबस्तात काम सुरू केले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.