वाहतूक कोंडीचा पेच सोडविण्यात अपयश ः चिंचवड प्रवासी संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
बोगदा मार्ग चार ऐवजी आठ पदरी करण्याची मागणी
चिंचवड – अरुंद रस्ते, वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे भूमकर चौकात दररोज सकाळी आठ ते बारापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत अशी दररोज आठ तास वाहतूक कोंडी होत आहे. जागतिक नकाशावर पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक क्षेत्र म्हणून ख्याती असली तरी ढिसाळ व लालफितीच्या कारभारामुळे चाकण, तळवडे, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 35 लाखांहून अधिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
चाकण, भोसरी, तळवडे परिसरात इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, आयटी हब काही हजार मोठे, मध्यम व लघुउद्योग क्षेत्रात काही लाख कामगार काम करतात. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमध्ये शेकडो कंपन्या कार्यरत आहे. देश परदेशातील अनेक उद्योजक, कंपनी प्रतिनिधी कामानिमित्ताने शहरात ये-जा करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे शहराचे जगभरात नाव असले तरी, वाहतुकीच्या गलथान व्यवस्थापन व राज्य व केंद्र सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे त्याचा त्रास प्रवासी, कामगार, अभियंते यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
भूमकर चौकामध्ये डाव्या बाजूला सातारा, बंगळूरकडे जाणार अरुंद रस्ता आहे. उजव्या बाजूला ताथवडे, बालाजी कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज, शाहू कॉलेज, जेएसपीएम कॉलेजकडे जाणारा 15 फुटी रस्ता, पुलाच्या बोगद्याच्या उजव्या बाजूला मुंबईकडे जाणारा व डाव्या बाजूने बंगळूर-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा अरुंद रस्ता आहे.
परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या दैनंदिन भेडसावणाऱ्या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस कारवाई करून तोडगा काढावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चिंचवड प्रवासी संघाने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन. डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे, हार्दिक पटेल यांनी निवेदन पाठविले आहे.