पुणे – आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आयसीएसईने विद्यार्थ्यांच्या गुणपद्धतीत गट एक, दोन व तीन याप्रमाणे विषयांची वर्गवारी केली होती. यंदा मात्र या गटात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. गटातील विषय बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणात वाढ झाली आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा याचा फटका बसण्याची शक्यता होती. राज्य मंडळाचा निकाल आधीच घटला असल्याने प्रवेश अडचणीचे बनले आहेत.
आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. सहापैकी पहिल्या पाच विषयांचे गुण अकरावी प्रवेशासाठी विचारात घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग-2 मध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी मार्गदर्शन केंद्र व आयसीएसईच्या शाळांमध्ये रविवारी (दि.23) सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.