योग फक्त योगासनांपुरताच मर्यादित आहे असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. कारण त्याचे शारीरिक फायदे सहज लक्षात येतात; परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांच्या संयोगमुळे अगणित फायदे होतात. मन, शरीर आणि श्वास यांचे संतुलन राखल्याने जीवनप्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
नियमित योगामुळे सर्वात महत्त्वाचे दहा फायदे –
-शारीरिक स्वास्थ्य तर पाहिजेच, पण त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी आपल्या उपयोगी पडतात.
-वजन कमी करण्यासाठीही योगाचा फायदा होतो. सूर्य नमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आणि योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
-ताणतणावापासून मुक्ती- आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावांचा निचरा करण्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.
-अंतर्यामी शांतता-सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. मात्र आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे. या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढून रोज योग आणि ध्यान केल्याने बरेच फायदे मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा उपाय नाही.
-रोगप्रतिकारक शक्तीत वाढ-शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-सजगतेत वाढ-मन हे सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते. वर्तमानकाळात मात्र ते कधीच राहात नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताणतणावातून मुक्त होऊ शकतो आणि मनाला शांत करू शकतो. योग आणि प्राणायामांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.
-नाते संबंधात सुधारणा- तुमचा जोडीदार, आई-वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात. तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यांसारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योग आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.
-ऊर्जा वाढते- दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही; परंतु रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यातून तुम्ही मध्येच दहा मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.
-शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते- तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्यामुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.
-अंतर्ज्ञानात वाढ- तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योग आणि ध्यानधारणे मध्ये आहे. तशी वाढ झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊन त्याचे फायदे मिळवू शकता. योग केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.