रेडा – प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये निधी मिळणार आहे. मात्र, यामध्ये दोन हेक्टर क्षेत्राची जाचक अट लावण्यात आली होती. सध्या ती अट शासनाने शिथील केली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील 20 हजार 530 शेतकऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.
याबाबत राज्य कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख (पीएम किसान) यांनी राज्यातील जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी, नोडल अधिकारी व सर्व पी. एम. किसान योजना संबंधित अधिकाऱ्यांना (दि.13) जून रोजी पत्र पाठविले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना ही योजना सरसकट लागू करावी, असे आदेश दिले आहेत. याबाबत केंद्र शासनाकडील पत्रानुसार पात्र कुटुंबाकरीता 2 हेक्टरपर्यंत मर्यादा होती. ती शिथील केली असून या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतीवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6 हजार रूपये वितरित करावे, असे सूचित केले आहे. त्याअनुषंगाने सर्व पात्र लाभार्थी कुटुंबाच्या याद्या संकलित करून पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याची तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.