बिदाल – माण तालुक्यामध्ये रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्राने समाधानकारक हजेरी लावली आहे. जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाल्यामुळे सध्या उत्तर तालुक्यातील शेतकरी बांधव खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्यांनादेखील उशीर झाला आहे.
खरीप पेरणीसाठी जास्त अवधी नसल्याने तालुक्यात जिकडे तिकडे खरीप पेरणीची लगबग दिसून येत आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरीबांधव पेरणीसाठी घाई करताना दिसून येत आहेत. तालुक्यातील पशुधन सध्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बैलजोडीच्या माध्यमातून पेरणीची वाट न पाहता यंत्राच्या सहाय्यानेदेखील पेरण्या उरकत असल्याचे महिबूब शेख यांनी सांगितले.
बैलजोड्यांच्या माध्यमातून पेरणीचा एकरी दर पंधराशे रुपये, तर यंत्राच्या सहाय्याने एकरी सहाशे रुपये इतका दर आकारला जात आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे कृषि केंद्रातील खते, बियाणे विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या दमदार हजेरीमुळे शेतकरीबांधव खरीप पेरणीच्या लगबगीत असल्याने बियाणे, खते खरेदीसाठी कृषि केंद्रावर गर्दी होत आहे. उडीद, मूग, कांदा, तूर हे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
खरीप पेरणीसाठी “कही खुशी कही गम’
टाकेवाडी, तोंडले, शिखर शिंगणापूर, वावहिरे, बिदाल, राणंद, नरवणे या भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या होताना दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांमध्ये पेरणीचा उत्साह दिसून येत आहे. शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे.
तालुक्यात खरिपाचे क्षेत्र वाढणार
दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा तालुक्यातील बागायती क्षेत्र घटून खरीप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यंदा खरिपाच्या पेरण्या उशिरा होत असल्यामुळे शेतकरीबांधव 40 दिवसांत निघणाऱ्या पिकांच्या उत्पादनाकडे त्यांचा जास्त कल दिसून येत आहे. यामध्ये मूग, चवळी, उडीद, कांदा पिकांचा समावेश आहे.